Friday, February 11, 2011

गांधींच्या मृत्यूविषयी...


गांधींच्या हत्येनंतर महिन्याभरातच म्हणजे १९४८च्या मार्च महिन्यात गांधींचे सर्वात जवळचे सहकारी, नेहरूंच्या अध्यक्षतेखाली सेवाग्राममध्ये भेटले. ह्यांमध्ये विनोबा भावे, क्रिपलानी, मौलाना आझाद, जयप्रकाश नारायण इत्यादी मान्यवर उपस्थित होते. हे सर्व सेवाग्राममध्ये गांधीहत्येविषयी विचारविनिमय करण्यासाठी एकत्र जमले होते. भारतापुढे या नंतर येणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करायचा यासंदर्भात या मान्यवरांनी काही ठोस निर्णय घेतले. त्यानंतर ६० वर्षांनी सेवाग्राममधील त्या विचारविनिमयाला प्रतिक्रिया म्हणून काही विचारवंत, लेखक व अभ्यासक साबरमती आश्रमात जमले. ‘आजच्या भारतात ‘गांधींचा’ अभाव’ हा त्यांच्या चर्चेचा प्रमुख विषय होता. आजच्या तरुण पिढीच्या मनात मोहनदास करमचंद गांधी या व्यक्तिमत्वाबद्दल काय आहे? आजचे तरुण नेते गांधींकडून प्रेरणा घेऊन लोकसहभागाच्या काही पद्धतींचा वापर करतांना दिसतात का? की त्यांना हे सर्व कालबाह्य वाटतं? या सर्व गोष्टी जाणून घेण्यात या विचारवंतांना रस होता.

गांधींबद्दल लिहिताना मी गांधीजी किंवा ‘महात्मा’ असं म्हणत नाही आहे. कारण ही सर्व बिरुदे आपल्याला त्या व्यक्तिमत्वापासून खूप दूर नेतात. एकदा का त्यांना संत-महात्मा म्हणून टाकलं की मग आपण ‘माणूस’ व्हायला मोकळे. आपण मग कधीच त्यांच्याशी नातं जोडू शकत नाही, प्रसंगी वादही घालू शकत नाही. गांधीही आपल्यासारखेच, आपल्यातलेच, निश्चितच असामान्य, पण माणूस होते. त्यांना असं फोटोमध्ये बंदिस्त करून ठेवून आपण ‘गांधी’या शक्यतेचा बळी देत असतो.

खरंच, आजच्या जगाला गांधी, गांधीवाद किती लागू करता येऊ शकतो? आजचे किती तरुण नेते त्या दृष्टीने काम करतात?

आज आपल्याला गांधी भेटतात ते मुन्नाभाईच्या स्वप्नांमधून त्याला झपाटून टाकणाऱ्या एका केमिकल लोच्यामध्ये; सान सु कीच्या म्यानमारमधील लष्करशाही विरुद्ध लोकशाहीसाठीच्या अहिंसक लढ्यामध्ये. ‘गांधी हे माझे प्रेरणास्थान आहे, आज जो काही मी तुमच्यासमोर आहे, तो गांधी आणि त्यांच्या संदेशामुळेच’ अशा ओबामाच्या वक्तव्यामध्ये. भारतीय लष्कराच्या विशेषाधिकाराविरुद्ध आवाज उठवून गेली तब्बल ११ वर्षे उपोषण करणाऱ्या मणिपूरच्या इरोम शर्मिलामध्ये.

आज जागतिक हवामानातील बदलांबद्दल चर्चा सुरु असू दे नाहीतर जागतिक अर्थव्यवस्थेबद्दल, गांधी आपल्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहेत असं सतत वाटत राहतं. गांधींचे सर्वार्थाने गाजलेले लेखन म्हणजे १९०९ मध्ये लिहिलेले ‘हिंद स्वराज’. या पुस्तकात त्यांनी आधुनिक संस्कृतीवर टीका केली आहे. ते असं म्हणतात की “जर भारताला खऱ्या अर्थाने स्वतंत्र करायचे असेल तर भारतीय शिक्षणपद्धती, शासनव्यवस्था, विचारप्रणालीचा पाया बांधला पाहिजे. पण आपण जर परकीय पद्धतींचे अंधानुकरण केले तर भारत कधीच खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणार नाही”. जरी अभ्यासकांनी या लेखनाच्या व्यवहार्यतेबद्दल शंका निर्माण केली असली तरी ही टीका आपल्याला नक्कीच आजच्या समाजाबद्दल, परस्पर व्यवहारांबाबत विचार करायला लावते.

गांधींना १२५ वर्ष जगण्याची इच्छा होती. म्हणजे ते १९९४साला पर्यंत आपल्याबरोबर असते. असं खरंच झालं असतं, आणि काँग्रेसच्या नेत्यांनी गांधींचं म्हणणं ऐकलं असतं, तर आजचा भारत कसा असता? कदाचित नेहरुंनी आधुनिक भारताची मंदिरे वेगळ्या प्रकारे बांधली असती – आणि आपण खरे विद्यार्थी घडवले असते. कदाचित राजकारणातला भ्रष्टाचार कमी असता, आपली गावे सुदृढ होऊन शेतीतंत्रज्ञानात भारताने प्रगती केली असती आणि शेतकऱ्यावर आत्महत्येची वेळ आली नसती. पण गांधींनी १९९४ पर्यंत काय पहिलं असतं? इतर २ गांधींची हत्या, पाकिस्तान बरोबरची युद्धे, आणीबाणी, बोफोर्स, आर्थिक उदारीकरण... कसा सोडवला असता त्यांनी काश्मीर प्रश्न? काय झालं असतं जातीय आरक्षणाचं? माहित नाही. गांधीना आत्ताच्या भारतात नक्कीचं परकं वाटलं असतं. म्हणूनच ते गेले. म्हणूनच आपण त्यांना घालवलं.

अनेक लोक गांधींच्या मृत्यूनंतरची आठवण सांगतात. ज्या दिवशी गांधींच्या मृत्यूची – त्यांच्या हत्येची बातमी कळली, तेव्हा अख्या देशात एक विलक्षण नीरव शांतता पसरली होती. समर्थक-विरोधक सारेच स्तब्ध. प्रत्येक खेड्याला, प्रत्येक शहराला या भयाण-भीतीयुक्त शांततेनी ग्रासलं होत. कशाची होती ही शांतता? अपराधीपणाची? भीतीची? काहीतरी खूप महत्वाचं अचानक हरवल्याची? पोरकेपणाची? वैचारिक अनिश्चिततेची? कशाची? इतिहासाने या घटनेची नोंद घेतली आहे का? अख्खे राष्ट्र शांत–स्तब्ध. का झालं असेल असं?

तेव्हा निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचा प्रयत्न आपण आजही करत आहोत.

लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरच्या बगीच्यामध्ये बरीच लोकं विविध विषयांवर निषेध नोंदविण्यासाठी गेलं वर्षभर आपला तळ ठोकून बसली आहेत. काहींना ब्रिटीश आर्थिक धोरण मान्य नाही, तर काही लोक ब्रिटनने अफगाणिस्तानातून आपले सैन्य परत फिरवावे यासाठी शांततामय निषेध नोंदवत आहेत. या सर्व विरोधकांच्या मागे, त्यांचं संघटन दाखवणारं गांधींचं एक वाक्य झळकत आहे. ‘बी द चेंज यु वॉन्ट टू सी इन थिस वल्ड’. आजही गांधी, आपल्या मृत्यूच्या ६३ वर्षांनंतरही ब्रिटिशांच्या विरोधात उभे राहिलेले दिसत आहेत.

३० जानेवारी या त्यांच्या पुण्यतिथीला अनेक समारंभ होतील, राजघाटवर भजने गायली जातील, फुले वाहिली जातील, लहान मुले शाळेत निबंधही लिहितील. या भजने, निबंध, समारंभात आपण त्यामागच्या व्यक्तीला विसरत चाललो आहोत. आज माहिती अधिकारासारख्या चळवळीतून, इरोम शर्मिलाच्या उपोषणातून, गांधी आपल्याशी संवाद साधण्याच्या प्रयत्न करत आहेत; ते ऐकण्याचं बळ मात्र आज आपल्यात नाही असं वाटत राहतं.

No comments: