Tuesday, February 28, 2012

आपण प्रगल्भ नाही


अणुविज्ञान, अणुर्जा आणि जैतापूर प्रकल्प हे फार तांत्रिक आणि अतिशय गुंतागुंतीचे विषय आहेत. मला व्यक्तिश: अल्पशा ज्ञानामुळे अणुर्जा ही धोकादायक वाटते आणि म्हणून हा प्रकल्प जैतापूरसारख्या ठिकाणी करणे हे धाडसाचे वाटते.

पण, मराठी राजभाषा दिनाच्या दिवशी आणि राष्ट्रीय विज्ञान दिवसाच्या आदल्याच दिवसाचेचित्य साधून शिवसेनेने अनिल काकोडकरांसारख्या आंतरराष्ट्रीय किर्तीच्या आणि एका मराठी अणुवैज्ञानिकाला जैतापूर अणुर्जा प्रकल्पाच्या बाजूने एक अवाक्षर काढू नका अशी धमकी/आदेश दिला. अशा व्यक्तिस्वातंत्र्य विरोधी भूमिका घेणार्‍यांचा मी निषेध करते.

जैतापूर अणुउर्जा प्रकल्पासारख्या दूरगामी परिणाम करण्यार्‍या, तांत्रिक विषयाबाबत धोरणात्मक निर्णय घेताना सत्ताधार्‍यांनी आणि विरोधीपक्षाने खुल्या चर्चा आयोजित करणं अत्यावश्यक वाटतं. काकोडकर आणि इतर शास्त्रज्ञांना या विषयी जाहीर वादविवाद करण्यासाठीची संधी आणि तसा राजकीय अवकाशही मिळायला हवा. त्याचबरोबर एखादा अप्रिय निर्णय घेताना शासनाने जनतेलाही विश्वासात घ्यायला हवे. तसे प्रामाणिक प्रयत्नही व्हायला हवेत, त्यातूनच जनमत निर्माण होईल.

दुर्दैवाने आज असे कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाहीत. प्रकल्प हवा की नको हा विषय वेगळा आहे. आत्ता किमान त्याबद्दल मोकळेपणाने चर्चा तरी होऊ द्या. आपण इतके असहिष्णु कधी झालो?

खुली चर्चा, मुक्त वातावरणात वाद-विवाद आणि आपल्याला न पटणार्‍या मतांचा आदर करणे हे एका प्रगल्भ समाजाचे आणि सुदृढ लोकशाहीचे लक्षण आहे. कालच्या प्रसंगावरून मराठी समाज अशा प्रगल्भतेपासून अजून फारच लांब आहे अशी दु:खद जाणीव झाली.